Friday, 11 April 2014

# कातरवेळ #

     काय होतं तो सूर्य डोंगरा आड जाताना? सगळी strength घेऊन जातो का तो?? काठ्या जोडून , दगड लावून आधार दिलेल्या मनाला एका फटक्यात पाडून जातो. काय होतंय कळतच नाही, केवळ रडावसं वाटतं . आता संध्याकाळ होतेय या भावनेनेच ऊर दाटून येतो. डोळ्यात आठवणी साठू लागतात… कडू आठवणी, दुखऱ्या आठवणी… एकदम येतात, गर्दी करतात नेमकी कुठली जास्त दुखावतेय हे पण कळेनासं होतं.
     अपमान, भांडण, दुरावा… सगळं डोक्यात फिरू लागतं आणि मग डोळ्यात उतरतं. आपण कुठे आहोत,काय करत आहोत, कुणासमोर आहोत, कशाचंच भान नाही राहत… आठवणी फक्त वाहू पाहतात त्यांना परिस्थिती चा बांध नकोसा होतो.
      होतं असंच, बऱ्याचदा… खुपश्या संध्याकाळी… काय आहे माझं आणि त्या आभाळाचं नातं?? त्यालाही नाही आवडत कदाचित असं मध्येच अडकायला. त्याला एकतर सूर्य हवा नाहीतर चंद्र! कोणीच नसलं की ते कावरंबावर होऊन जातं, सुन्न होऊन जातं.  सूर्य असताना ते strong असतं. सुंदर निळा रंग लेऊन चमकत राहतं, पांढऱ्या शुभ्र ढगांबरोबर फेर धरून गाणी म्हणतं. आणि चंद्र असला की शांत असतं. काळ्या रंगाची गहराई घेऊन खोल खोल जातं. अथांग आणि प्रेमळ होतं, रातराणीसारखं सुगंधी होतं! पण त्याला हि मधली phase आवडत नाही.
      मला पण नाही आवडत शांत राहायला… वाट बघायला… हात सोडायला... पण उद्याची संध्याकाळ मी थांबेन. धावणार नाही, लपणार नाही. आभाळाकडे बघणार… सूर्याला सोडून देणार. चंद्राची वाट पाहणार. थोडाच वेळ आहे… मग फक्त प्रेम, चांदणं , शीतलता, वाऱ्याची झुळूक आणि निशिगंध… तो आणि मी … वाटून घेणार आनंद ,दुःख, प्रेम आणि शांतपणे डोळे मिटणार त्याच्या अथांग कुशीत…

No comments:

Post a Comment